दंडराज्य आणि राख गोष्ट.
Story of Magistrates and Ashes : फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक राजा होता. त्याचं नाव होतं दंड. दंड राजाचं राज्य एका मोठ्या नदीच्या खोऱ्यात वसलेलं होतं. नदी गाळ वाहून आणत होती, दोन्ही तटांवर पसरवत होती. राज्याची जमीन संपन्न होती. नदीकिनारी घनदाट जंगलं होती. जंगलांच्या पलीकडे शेतं होती. जंगलं आणि शेतं यांचं आपापसात बरं चाललं होतं. जंगलं शेताला सांभाळून घेत होती. माती धुपून जाऊ देत नव्हती. मातीला सकस खाऊ देत होती. जंगलाच्या ओलाव्यात शेतं सुखावली होती. सूर्यप्रकाश पिऊन ती धष्टपुष्ट झाली होती. शेतातली तरारलेली कणसं कुणाकुणाचं पोट भरत होती ?
Story of Magistrates and Ashes
जंगलाच्या आत माणसं राहायची. ती कणसांकडे पाहायची पण कणसांना हात नाही लावायची. त्यांना जंगलमेवा जास्त रुचायचा. कधीमधी एखादा उंदीर आणि फारच नशीब चांगलं निघालं तर ससा मारून खायची. त्यांना दुसरी रीत ठाऊक नव्हती. शेतात माणसं राबायची. सकाळ ते संध्याकाळ काम करायची. दुपारी घाम पुसत सावलीला बसायची. रानातली माणसं आणि तिथली मुलं कधी त्यांच्या जवळ यायची. कधी त्यांना एखादं कणीस मिळे किंवा कधी नुसताच धपाटा – ‘दूर हो!’ सांगणारा. कधीमधी जर सावलीत बसलेल्या माणसांना जंगलातल्या माणसांकडून ताजा ताजा मध मिळाला तर मात्र ती खूष होत. मग त्या दिवशी मक्याचा एखादा रोट मधाला लावून खाण्याची मजा जंगलातल्या मुलांनासुद्धा मिळायची.
जंगल आणि शेत यांच्यापासून दूर गाव होतं. ती राज्याची राजधानी होती. तिथे लागून लागून घरं होती, रस्ते होते, पाण्याचे हौद होते. राजाचा एक यथातथा महालही होता. दंड राजाला कायम तिजोरी रिक्त राहू नये याची चिंता लागून राहिलेली असायची. राज्याचा पसारा वाढत चालला होता. गाव मोठं होत होतं आणि खर्च सतत वाढत होते. त्यातच भर पडली ती आश्रमासाठी जमीन मागायला आलेल्या एका ऋषींची.
‘आली कटकट!’ ऋषींना पाहून राजाच्या मनात आलं, ‘हे महसुलात भर तर घालणार नाहीतच, शिवाय सारखे झोळी पसरून भिक्षा मागतील!’
राजाच्या मनातली बाब ऋषिवर्यांनी ओळखली. ते राजाला म्हणाले, “मी तुला वचन देतो राजा, आमचा तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. आम्ही संसारापासून लांब आलेली माणसं. आम्ही आमच्यापुरतं जुजबी पिकवू आणि खाऊ. आमची तपस्या हाच आमचा धर्म. बाज्यावर आम्ही भार होणार नाही. उलट, आश्रमात आपलं कायम स्वागतच असेल. तुम्हाला कधीमधी गरज लागली तर…” “पुरे…” राजा एकदम गरजला. “आधीच हात पसरलेले आणि त्यात आम्हाला काही देण्याची भाषा ? पुरे हा तमाशा ! देतो तुम्हाला जमीन. ती घ्या आणि सुखी व्हा. पण लक्षात ठेवा, शिरजोर होऊ लागलात तर मात्र गय केली जाणार नाही! जमीन देतोय. यापलीकडे कपर्दिकही मिळणार नाही! चालणार असेल तर ठीक..”
ऋषी एकदम शांत झाले. राजा बोलत होता त्यात गैर तरी काय होतं? त्यांनी मान खाली घातली. राजाचं आज्ञापत्र घेतलं आणि ते आपल्या मोजक्या शिष्यांच्या समूहासह आश्रमाच्या जागेच्या दिशेने निघाले. त्यांच्यापुढे आश्रम उभारणीचं मोठं काम होतं.
ऋषी आणि त्यांच्या शिष्यांनी काम सुरू केलं. याची खबर आजूबाजूच्या लोकांपर्यंत गेलीच. काही लोक मदतीला आले, काहींनी त्रास द्यायला सुरुवात केली, तर काही नुसतेच एका अंतरावरून पाहत बसले. आश्रम उभारणीचं काम शांतपणे चालू होतं. कामं चालू ठेवायला पोटाची खळगी तर भरायला हवी. शिष्यवर्ग शेतकऱ्यांपाशी जात असे. जबरदस्ती नव्हती, पण भिक्षा घातली तर आशीर्वाद मिळायचा. ज्या शेतकऱ्यांना आशीर्वाद मोलाचा वाटायचा ते भरभरून भिक्षा देत, उरलेले पूर्ण दुर्लक्ष करत.
also read : Story of Pandu Stone
जंगलातले भाईबंद या नव्या मंडळींनी जरासे भांबावून गेले; पण त्यांचा काही उपद्रव नाही; उलट, ते आपल्याला दूर लोटून देत नाहीत हे कळल्यावर ते आश्रमाच्या अधिक जवळ येऊ लागले, जंगलातल्या भेटी त्यांच्यासाठी आणू लागले. काहीजण इतके जवळ आले की आश्रमातली रोजची कामं शिकून घेऊ लागले. दूधदुभतं, सडा-सारवण, समिधा गोळा करण यात त्यांना रुची उत्पन्न झाली. ऋषी सगळ्यांवर नज ठेवून होते.
हळूहळू ऋषिवर्याच्या लक्षात येऊ लागलं की शेतकरी आणि जंगलातले रहिवासी यांच्यात तेढ आहे. गोष्टी काही सोप्या नाहीत. जंगल जसजसं कमी कमी होतं आहे तसं जंगलातल्या लोकांना अधिकाधिक उघडं पडल्यासारखं होत आहे; त्यांचं अन्न, आसरा सारंच संपत चाललं आहे. ऋषींनी त्यात लक्ष घालायचं ठरवलं. सूर्योदय-सूर्यास्ताच्या वेळी दोघांनाही ते प्रार्थनेला एकत्र बसवून घेऊ लागले. याने काही काळ शांतता पसरायची, पण मधूनच लाह्या तडतडाव्यात तशी भांडणं व्हायची. ऋषी दोन्ही बाजू ऐकून भांडण सपेल असं काहीबाही सांगायचे.
याने ऋषींची कीर्ती वाढू लागली. ती राजाच्या कानावर गेली. आपल्याकडे येऊ घातलेली भांडणं परस्पर मिटताहेत याने त्याला काही काळ बरं वाटलं; पण पुढचा विचार त्याच्या मनात आला, ‘हे गुरुजी शिरजोर तर नाही ना होणार? हळूहळू सगळ्याच गोष्टी त्यांनी हाती घेतल्या म्हणजे? माझी गरजच सपेल.’ त्याची तडफड सुरू झाली. त्यातच त्याला एका आक्रमणाची खबर लागली. राज्यावर येऊ घातलेलं हे सगळ्यात मोठं संकट होतं. राजा घाबरला. त्याला राज्याच संरक्षण तर करायला हवं होतं, पण स्वतःवर युद्ध शेकू नये अशी त्याची फार इच्छा होती. त्याने सेनापतींसकट सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावली.
सगळ्यांना आपली कामं वाटून दिली आणि विचारलं, ” मी कुणाबरोबर थांबू म्हणता ? माझी गरज सर्वांत जास्त कुठे आहे?” या मानभावी प्रश्नाच्या मागे काय लपलंय हे सगळ्यांना कळलं नाही. कळून फारसा फायदाही नव्हता. राजाने करायचं तेच केलं असतं हे सर्वांना कळलं होतं. सगळे म्हणाले, “आपली गरज राज्याला आहे. आपण सर्वांत सुरक्षित ठिकाणी असलं पाहिजे. युद्धात राजाची सुरक्षा सर्वांत महत्त्वाची. आपण कुठल्या तरी अतिसुरक्षित जागी गेलं पाहिजे.”
राजाने मान डोलावली. अशी जागा कोणती ? गुप्त भुयार की दूर पर्वतातली गुंफा ? याहीपेक्षा एक सुरक्षित जागा राजाला ठाऊक होती ऋषींचा आश्रम. हा विचार सगळ्यांनाच पसंत पडला. ऋषींच्या नावाचा दबदबा राज्याच्या सीमा ओलांडून बाहेर पोचला होता. त्यांच्याविषयी आदर तयार झाला होता. कोणी तिथवर येऊन राजाला धक्का लावण्याचं धाडस केलं नसतं. आपल्या मोजक्या सैनिकांनिशी राजा निघाला. केलेल्या उपकारांची परतफेड मागण्याचा दिवस आला होता.
आश्रमात राजाचं स्वागत झालं. ऋषींनी त्याच्या मनातली गोष्ट जाणून घेतली आणि त्याच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली. सीमेवर माणसं लढत असताना राजा आश्रमाच्या गर्द राईत सुखाने कालक्रमणा करत बसला. त्याला हे जीवन फार आवडलं. इथे कसली चिंता नव्हती, रोजची कामं नव्हती. तो सुस्तावला, त्याचे सैनिक सुस्तावले. मग जे व्हायचं तेच झालं. त्यांनी आश्रमाची घडी विस्कटेल अशा गोष्टी करायला सुरुवात केली. ते कधी मोठ्या शिकारीला जाऊन रान दणाणून टाकायचे, तर कधी आजूबाजूच्या पोरीबाळींची छेड काढायचे. सगळेच त्रासून गेले. ही पीडा इथून कधी जाईल असं सगळ्यांनाच झालं होतं.
also read : Story of Pandu Stone
आणि त्यातच तो उद्रेक घडला. शिकारीसाठी रान पेटवून द्यायचं ठरलं. फार नाही, प्राणी पाण्यावर येतात त्या तळ्याच्या आसपास. प्राणी चांगले कोंडीत सापडतील. आणि मग मनसोक्त शिकारीचा आनंद ! झालं, आग लावून देण्यात आली. जोरजोराने टिमकी बडवणं सुरू झालं. आरडाओरडा. सगळीकडे एकच गोंधळ. आणि आग फैलावली… अशी काही पसरू लागली की तिला थांबवणं अशक्यप्राय असल्याचं दिसू लागलं… मग आणखीनच गोंधळ… माती टाका, पाणी टाका. पखाली तरी किती पुरणार? आगीने मग तिची भूक शांत झाल्यावरच विराम घेतला. तोवर रान पुरतं संपलं होतं. शेतांनासुद्धा झळ लागली होती. सगळेजण हबकल्यासारखे होऊन इतस्ततः भटकत होते. कुठे काय संपलं, काय शिल्लक राहिलं हे चाचपडत होते.
आश्रमालाही झळ बसली. रानातला आक्रोश ऋषिवर्यांपर्यंत पोचला तशी ते आपल्या कुटीच्या बाहेर आले. काय झालं ते त्यांनी बघितलं. आता त्यांच्या सहनशीलतेचा बण संपला होता. राजाचा खेळ… खेळ कसला, पोरखेळ बघून ते हतबुद्ध झाले. त्यांच्या दिशेने आश्रमवासी, जंगलातली माणसं, शेतकरी सारेच येत होते… आपली करुण कहाणी त्यांना सांगत होते. सर्वस्व लुटलं गेलं होतं त्यांचं… तक्रार कुणाकडे करणार ? आपलाच राजा तो !
ऋषी कृद्ध झाले. तो त्यांना आश्रमाच्या दिशेने येणारा राजा दिसलाच. शिकारीच्या जीवघेण्या खेळाची आग अशी भडकेल असं त्याला वाटलंच नव्हतं म्हणे. त्याला तो फक्त एक अपघात वाटत होता. त्याला लोकांच्या रागाचं कारण कळेना, ऋषींच्या रागाचं कारण कळेना. आपण काहीच केलं नाही अशी बतावणी तो करू लागला. ऋषिवर्यांना या साऱ्याची किळस आली आणि त्यांनी शापवाणी उच्चारली. ते म्हणाले, “राजा, मोठ्या श्रमाने आणि प्रेमाने उभा केलेला हा आश्रम आम्ही सोडून जातो आहोत.
आता स्वतःला कुठे लपवायचं ते तू ठरव. राज्यावर चालून आलेल्या शेजारील शत्रूपासून तू स्वतःला वाचवशीलही. पण हे ऐक- आजपासून सात दिवसांनंतर आकाशातून तप्त धुळीचा वर्षाव होईल आणि त्याखाली तुझा सारा उन्मत्तपणा गाडला जाईल. इथे काहीही जिवंत राहणार नाही.” शापवाणी उच्चारून ऋषी त्या परिसरातून निघून गेले. त्यांच्यासोबत अनेक रहिवासीदेखील गेले.
also read : Story of Pandu Stone
शापवाणीप्रमाणे खरोखरच आठवड्याभरात दंडाचं सारं राज्य आकाशातून पडलेल्या राखेखाली गाडलं गेलं. काही काळाने त्यावर झाडं उगवली, नदी पुन्हा वाहू लागली, माणसांनी पुन्हा वस्ती केली. पडलेल्या राखेचे कण तिथे अजूनही नदीच्या काठच्या मातीच्या थरांत दिसून येतात, गोष्टीची आठवण करून देत राहतात.