अद्भुत गोष्टी मंडळ गोष्ट मराठीत.
Story of Circle of Wonderful Things : संध्याकाळी पिंपळाचं झाड पक्ष्यांमुळे आणि चौमुखी गणपतीचा पार पोरांमुळे दणाणून जात असे. पण अंधार पडू लागला की पक्षीही शांत होत आणि शिवणापाणी, धप्पाकुट्टी, पकडापकडी, लपाछपी, लगोरी खेळून थकलेली पोरंही पाराच्या पायऱ्यांवर बसून राहत.
काहीजण शर्टाच्या बाहीने निथळणारा घाम पुसत. पारावर लाइटचा एकुलता एक खांब होता. हा लाइट लागायचा, पण त्याचा प्रकाश मात्र फारसा पडायचा नाही. कारण त्या लाइटच्या झाकणात चांगले ऑजळभर किडे साचलेले होते. डोक्यावर कुणी तरी टपली मारल्यासारखं पिंपळाचं पान वाऱ्याबरोबर गिरक्या घेत अंगावर येऊन पडायचं, पारासमोरच्या गणपतीच्या देवळात गल्लीतल्या बायका, मोठी पोरं-पोरी तेल-वात टाकायला येत. हा गणपती वेगळाच होता. चौकातला म्हणून चार तोंडांचा. एकाच मोठ्या दगडात चारही बाजूंनी सारखीच दिसणारी गणपतीची मूर्ती होती.
Story of Circle of Wonderful Things in Marathi
गणपतीसमोर एक महादेव होता, पण या महादेवाला पिंडच नव्हती. म्हणजे गणपतीला चार-चार तोंडं आणि महादेवाला एकही पिंड नाही. काहीजण म्हणत, ही पिंड अदृश्य झाली. काही जणांच्या मते ही पिंड चक्क चोरीला गेलीय. यातली खरी गोष्ट बब्बूमामाने मला सांगितली होती. दगडांचा-शंखांचा अभ्यास करणारे एक गुरुजी गावात होते. त्या गुरुजींनी अभ्यासांती या पिंडीचा दगड मौल्यवान आहे असा निष्कर्ष काढला होता. पिंडीच्या दगडाचं मौल्यवान असणं कानोकानी पसरत गेलं आणि एके दिवशी ती पिंडच गायब झाली. या गोष्टीला कित्येक वर्ष लोटली, तरी अजूनही धोंडूतात्यांच्या स्वप्नात ही पिंड येते आणि ‘मला सोडव, मला सोडव’ असं म्हणते म्हणे. त्या पिंडीला कुणी कुठे डांबून ठेवलंय माहीत नाही.
तर अशा या गूढ परिसरातच आम्ही पोरं वावरत असू. गल्लीत बऱ्याच अरुंद बोळी होत्या. दोन वाड्यांच्या मधली चिंचोळी जागा खुष्कीचा मार्ग म्हणून वापरली जाई. अंधार पडल्यावर अशा बोळीतून जाताना भीती वाटे. ही भीती कमी होण्यासाठी आम्ही पोरं ‘राम राम राम राम’ असं पुटपुटायचो. आमचा नेहमीचा अड्डा असलेल्या पारावरचे दिवे वाऱ्याबरोबर थिरकायचे. म्हणजे दिव्याची ज्योत हलली की प्रकाश हलल्यासारखा वाटायचा. वर पिंपळाची पानं वाजायची.
अशा वातावरणात पाराच्या एका कोपऱ्यात आम्हा पोरांच्या अद्भुत गोष्टी सुरू व्हायच्या. कुठे-कुठे ऐकलेल्या गोष्टी आम्ही पोरं तिखट-मीठ लावून सांगत असू. म्हणजे निघताना साप निघे करंगळीएवढा, पण सांगत सांगत तो होई मांडीएवढा. या गोष्टीत खरेपणापेक्षा खमंगपणा महत्त्वाचा होता. आमच्या या गोष्टी मंडळात अद्भुत गोष्टी सांगण्यासाठी चढाओढ लागे. त्यात मध्यरात्री गल्लीत फिरणारा, डोक्यावर चमकदार मणी असणारा नाग हमखास रंगवून सांगितला जात असे. हा नाग फिरताना त्याच्याभोवती मोगऱ्यासारखा सुगंध दरवळत असे.
आमच्या गोष्टीत नेहमी येणारं एक घुबडही होतं. या घुबडाला जर कुणी दगड मारला तर तो दगड घुबड चोचीत पकडत असे. खूप लांब जंगलात एक नदी होती गरम पाण्याची. या नदीत घुबड तो चोचीतला दगड नेऊन टाकत असे. मग त्या नदीतल्या पाण्यात तो दगड जसजसा विरघळत जाई, तसतसा इकडे दगड मारणारा माणूस हडकुळा होत जाई. गावात कुणी हाडकुळा माणूस दिसला, की त्याने बहुधा घुबडाला दगड मारला असेल, घुबडाने तो दगड गरम पाण्याच्या नदीत नेऊन टाकला असेल, गरम पाण्यात तो दगड विरघळल्यामुळेच हा माणूस हाडकुळा झाला असेल, असं आम्हा पोरांना वाटे. काही अद्भुत गोष्टींमधली गम्मत कळत असे, पण काही गोष्टी मात्र कायम अद्भुतच राहत.
अद्भुत गोष्टीमुळे मनात एक प्रकारचा ताण निर्माण होत असे. याउलट, गोष्टीतली गम्मत कळली की मनाला हलक हलकं वाटे. उदाहरणार्थ, यात्रेला गेलेल्या यात्रेकरूंची गोष्ट. एकदा आमच्या गावातले सावकार सहकुटुंब तीर्थयात्रेला गेले. समुद्रकाठच्या तीर्थक्षेत्री मुक्काम पडला. सोबत स्वयंपाकाची व्यवस्था होती. समुद्राकाठावर एका मोठ्या दगडावर बायकांनी चूल पेटवली. पोळ्यांसाठी पीठ भिजवणं सुरू होतं. तेवढ्यात चूल ठेवलेला दगड हलू लागला. बायकांना वाटलं, भूकंप होतोय. पण बाकी काहीच हलत नव्हतं. बायका घाबरून ओरडायला लागल्या. आता तर दगड चक्क चालू लागला. पेटलेली चूल दगडासह चालू लागली. हा आरडाओरडा ऐकून लोक गोळा झाले. दगड चुलीसह समुद्रात निघाला होता. बायकाना घाम फुटला. अंग थरथर कापू लागलं.
हा प्रसंग ऐकताना आम्ही बसलेला पारही हलतोय, असं आम्हाला वाटत होतं. पण तो चालणारा दगड म्हणजे समुद्रकाठावर विश्रांती घेणारं मोठं कासव होतं. चुलीतला जाळ पोळू लागल्यामुळे कासव पाण्याकडे पळू लागलं. हे कळलं तेव्हा सगळ्यांचा ताणलेला श्वास हलका झाला होता.
आजही गणूने पुन्हा डोक्यावर मणी असलेल्या नागाचा विषय काढलाच. त्याच्या काकाला या मणीवाल्या नागाचं फरकांडं रस्त्यावर भल्या पहाटे दिसलं होतं. हा मणीवाला नाग आमचा हक्काचाच होता. तो कधीही त्याच्या डोक्यावरचा मणी चमकवत आमच्या गोष्टीतून फिरत असे. सुभाषला हा नेहमीचा पांचट विषय आवडला नसावा. तो म्हणाला, “तो बोरछाप मणीवाला नाग सोडून नवं काही तरी सांगा राव.”
मध्येच थांबवल्यामुळे गणूला जरा राग आला. रागातच तो बोलला, “सगळ्यांना बोरछाप, बोरछाप म्हणतोस, मग सांग की एखादी खतरनाक गोष्ट.”
सुभाषनेही हे आव्हान स्वीकारलं. त्याच्या डोक्यात एक गूढ गोष्ट वळवळतच होती. तो नीट सावरून बसला. आम्ही जवळ सरकलो. दबक्या आवाजात गोष्ट सुरू झाली. सुभाषचा चेहराही अद्भुत वाटत होता. सुभाष सांगू लागला – “आपल्या नदीच्या वर देशमुखांचा फुलांचा मळा आहे. या मळ्यात मोगऱ्याची शेती आहे. सर्वत्र फुलांचा घमघमाट असे…”
या फुलांच्या घमघमाटात पुन्हा एकदा नवा नाग वळवळेल असं आम्हाला वाटलं. पण गोष्ट खरीच वेगळी होती. सुभाष तल्लीन होऊन सांगत होता, “त्या मळ्यात पोपटी पानांची तीन झाडं आहेत. असतील गुडघ्याएवढी.”
तेव्हाचा राग शांत न झाल्यामुळे मधेच गणू बोलला, “म्हणे पोपटी पानांची तीन झाडं ! त्यात काय ? या पोपटी पानांच्या झाडांना काय पोपटं लागलीयत का ? फुसकी गोष्टय ही…” आम्ही गणूला चूप केलं. कारण सुभाष कधी तरीच पण धमाल गोष्ट सांगायचा. सुभाषलाही ही नवी गोष्ट सांगण्याची उत्सुकता होती. तो पुन्हा गोष्टीत घुसला. “ती पोपटी पानांची तीन झाडं आहेत ना, ती स्वतःची जागा बदलतात.” बाप रे! सगळ्यांच्या चेहऱ्यांवर आश्चर्य उमटलं होतं. गणपतीसमोरची वाऱ्याबरोबर हलणारी दिव्याची ज्योत विचित्र वाटू लागली. सुभाष त्या जागा बदलणाऱ्या झाडांचं वर्णन करतच होता… “विहिरीजवळ महादेवाचा ओटा होता. त्या ओट्याजवळ ही झाडं होती.
also read : Story of Our friend Immy! in Marathi.
एकदा शेतात काम करणारा गडी सकाळीच महादेवाला पाणी घालायला गेला. गड्याने पाणी घातलं. ताजी मोगऱ्याची फुलं पिंडीवर वाहिली. उरलेली चार फुलं सूर्याला म्हणून हवेत उधळताना त्याच्या लक्षात आलं, तिथली पोपटी पानांची तीन झाडं गायब झाली आहेत ! झाडं तोडल्याच्या, उपटल्याच्या खुणा मात्र नाहीत. गड्यालाही आश्चर्य वाटलं. अशी विचित्र झाडं कुणाच्याच पाहण्यात नव्हती. गड्याचं आयुष्य शेतात गेलेलं, पण झाड अचानक गायब होणं त्यालाही माहीत नव्हतं. मग ही तीन झाडं गेली कुठे? त्याने एक-दोघांना झाडचं गायब होणं सांगितलं, तर ऐकणाऱ्यांनी ते हसण्यावारी नेलं. पण गड्याच्या डोक्यातला भुंगा काही जाईना. तो शेतात इकडे-तिकडे झाडांना शोधू लागला. आणि एके दिवशी लिंबाच्या झाडाखाली आंब्याच्या कोयी खेळणारं गड्याचं पोरगं ओरडत आलं,
“बापूऽऽ, देवाजवळची झाडं लिंबाखाली कडब्याच्या ढिगाजवळ हाईत !”
गड्याच्या मनात शंका होतीच. तो पोरामागे धावत गेला. पाहतो तो काय, तीच पोपटी पानांची गुडघ्याएवढी तीन झाडं लिंबाजवळ उभी होती. जणू काही आधीपासून ती तिथे आहेत. गडी घाबरला. पोराला घेऊन तो धूम पळत सुटला. त्याने मालकाला ही गोष्ट सांगितली; पण मालकानेही ही गोष्ट हसण्यावारी नेली. शेवटी मालकाला गड्याने सर्व प्रकार मळ्यात नेऊन दाखवला. मग झाडांचं जागा बदलणं मालकालाही पटलं. त्या झाडांना पाहण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली. बातमी गावात पसरली.
जुनी माणसं कुजबुजू लागली. कुणी तरी म्हणालं, “फुलाच्या मळ्यात खूप वर्षांपूर्वी तीन पोरं विहिरीत बुडून मेली होती. तीच तीन पोरं झाडं होऊन मळ्यात फिरतायत.” शेवटी मालकाने लांबच्या गावाहून जाणत्याला बोलावलं.
जाणता आला. पण तेवढ्या वेळात पोपटी पानांची झाडं गायब झाली. शेवटी विहिरीजवळच्या महादेवाला अभिषेक करा, भंडारा करा,
न्नदान करा, असं सांगून जाणता निघून गेला. मालकाने भंडाऱ्यात गावजेवण दिलं. जेवताना लोक चर्चा करू लागले. कुणाच्या मते अशा जागा बदलणाऱ्या वनस्पती जंगलात असतात. कुणाचा अंदाज होता, की आभाळात उंच उडणाऱ्या पक्ष्यांच्या विष्ठेतून हे बी फुलांच्या मळ्यात पडलं असावं. लोक भरपेट जेवले. चर्चा सुरूच राहिल्या. या पोपटी पानांच्या झाडांबद्दल आम्हा पोरांनाही थोडी भीती आणि जास्त कुतूहल वाटू लागलं. नदीचं पाणी उतरल्यावर एकदा फुलांच्या मळ्यात ही झाडं शोधायला जायचं ठरू लागलं..
तेवढ्यात पारामागच्या वाड्यातून धोंडूतात्यांचा आवाज आला, “पोरांनो, अंधार किती झालाय ! घरंदारं नाहीत का रे तुम्हाला?” चड्ड्या झटकत पोरं उभी राहिली आणि पाहता पाहता घरोघर पसार झाली.
खरं तर या अद्भुत गोष्टी मंडळाचा मी आधीपासूनच सभासद होतो. गोष्टी सांगायला आणि ऐकायला मला खूप आवडायचं. एकदा कुणीच सुरू करेना म्हणून आणि पुन्हा एकदा मणीवाला नाग येऊ नये म्हणून मी एक गोष्ट सांगितली. ती गोष्ट होती उजव्या तळहातावर एकच केस असलेल्या माणसाची. असा तळहातावर एक केस असणारा माणूस खंडोबाच्या माळाखालच्या शेतात राहत होता. तो कधीही गावात येत नसे. कुणाशी बोलतही नसे. हातांत तो कायम हातमोजे घालत असे. त्याच्या जेवणाचा डबा रोज घरून जायचा. तो कुणासमोर कधी जेवायचा नाही. त्याच्यासमोर तर तो कधीच कुणाला जेवू द्यायचा नाही. कारण तळहातावर केस असणाऱ्या य माणसाने अन्न बघितलं की त्या अन्नाचं विष व्हायचं. म्हणजे याची नजरच विषारी होती. एकदा स्वतःच्या मुलीच्या लग्नासाठी म्हणून हा माणूस गावात आला. चुकून त्याची नजर स्वयंपाकावर पडली, तर त्याने सर्व अन्न शेतात खड्डा करून पुरायला लावल. दुसरा स्वयपाक करून लोकांना जेवू घातलं. या विषारी नजरेचा अनुभव एका शेतावरच्या मजुराला आला होता. या माणसाने पाहिलेली भाकरी खाल्ल्यामुळे तो मजूर उलट्या होऊन मेला होता. कुणी तरी या विचित्र माणसाला तळहातावरचा केस उपटून टाकण्याचा सल्ला दिला. कदाचित तसं केल्याने नजरेतला जहरीपणा जाईल म्हणून त्याने तळहातावरचा केस उपटलाही. पण पाच-सहा दिवसांनी पुन्हा तळहातावर तिथेच एक केस उगवला. ही गोष्ट मला बब्बूमामाने सांगितली होती. या माणसाच्या उजव्या तळहातावरचा केस पाहण्याची मला खूप इच्छा होती. बब्बूमामाने त्या माणसाशी भेट घालून देण्याचं मला कबूल केलं होतं.
also read : Story of Our friend Immy! in Marathi.
दिवस संपून कधी एकदा संध्याकाळ होते आणि आम्ही गणपतीच्या पारावर गोळा होतो असं वाटायचं. या अद्भुत गोष्टींचे परिणाम आमच्यावर दिवस-रात्र होत राहत. शाळेत डबे खाताना पुन्हा एकदा या गोष्टीतल्या विषयावर चर्चा होई. बऱ्याचदा रात्री स्वप्नात या गोष्टी दिसत. मला एक दिवस आमच्या शाळेतल्या प्रार्थनेच्या रांगेत पोपटी पानांची तीन झाडं उभी असलेली दिसली.
दचकलात काय ? स्वप्नात दिसली हो! असो. काही झालं तरी संध्याकाळी आम्ही पारावर जमायचो. खेळून दमायचो. नंतर पाराच्या कोपऱ्यात आमचं अद्भुत गोष्टी मंडळ सुरू व्हायचं.
आज मंडळात रत्न्या आला होता. ‘रत्नाकर’ असं त्याचं नाव, पण आधीपासून सगळे त्याला ‘रत्न्या’च म्हणायचे. हा शिक्षणासाठी शहरात राहायचा. सुट्टी असली की घरी यायचा आणि पठ्ठ्या नव्या गोष्टीसह संध्याकाळी पारावर हजर व्हायचा. हा नुस्ता गोष्ट सांगायचा नाही तर प्रत्यक्ष बरेच पराक्रमही करायचा. म्हणजे एकदा उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या. प्रचंड उकाडा होता. काही लोक घरासमोरच्या ओट्यावर झोपायचे. पाराशेजारच्या वाड्यातले सावकार रात्री आठ वाजताच वाड्यासमोरच्या ओट्यावर घोरत असत. घोरताना सावकाराच्या तोंडाची विचित्र उघडझाप होई. तोंड उघडल्यावर तोंडातला सोन्याचा दात चमकायचा. एक दिवस रत्न्याने मुद्दाम खिशात आणलेला मिठाचा खडा सावकाराच्या घोरणाऱ्या तोंडात सोडला. सावकारांना प्रचंड ठसका लागला. बिचारे सावकार नंतर किती तरी वेळ ‘खोकलत’ होते. तर हे महाशय पुन्हा सावकारांना ‘पाणी आणून देऊ का’ असं विचारत होते.
अशा या पराक्रमी माणसांच्या गोष्टी शहरातल्या असत. त्याने एकदा रस्त्यावरून उडणाऱ्या मोटारसायकलीची गोष्ट खूप छान सांगितली होती. सगळ्यांना ही गोष्ट खूप आवडली. डोक्याला घालतात त्या हेल्मेटबद्दल त्याने अशी काही माहिती सांगितली, की आम्हाला हेल्मेट म्हणजे मेंदूचं रक्षण करणारी जादुई वस्तूच वाटली होती. तेव्हा आम्ही हेल्मेट बघितलं नव्हतं. हे हेल्मेट घातल्यावर काहीही पराक्रम करता येऊ शकतो, असा आमचा समज झाला होता. पण रत्न्याच्या या गोष्टीमुळे आमचं अद्भुत गोष्टी मंडळ धोक्यात आलं होतं. या गोष्टीतल्या उडणाऱ्या मोटारसायकलची प्रेरणा घेऊन हेम्याने (मूळ नाव हेमंत) सायकल चालवताना सायकल थेट हवेत उडवण्याचा प्रयत्न केला.
त्याच्या हाता-पायाला बऱ्यापैकी मार लागला इथपर्यंत ठीक होतं, पण खरा घोटाळा वेगळाच होता. रत्न्याच्या गोष्टीतलं जादुई हेल्मेट म्हणून हेम्याने डोक्यात चक्क दूध तापवण्याचं भांडं घातलं होतं. सायकल हवेत उडाली, कोसळली आणि डोक्यावर घातलेल्या भांड्यात हेम्याचा चेहरा अडकला. त्याला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. गावातले डॉक्टर म्हणाले, शहरात मोठ्या दवाखान्यात घेऊन जा. तशा अवस्थेत हेम्याला जीपमध्ये घालून शहरात नेलं. तिथे डॉक्टरांनी बऱ्याच प्रयत्नांनी हेम्याची भांड्यापासून सुटका केली.
नंतर हेम्याची आई आम्हाला खूप बोलली. त्या पारावरच्या भुताखेतांच्या गप्पांमुळेच पोरांची टाळकी बिघडतायत, असं तिचं म्हणणं होतं. मग काय, तिच्या या सुरात सूर मिसळत आणखी काही घरांत ओरडाओरडी, रागवारागवी झाली. परिणामी, आमचं अद्भुत गोष्टी मंडळ शांत झालं. संध्याकाळी पारावरच्या गोष्टी बंद झाल्या.
संध्याकाळी आमचं खेळून झालं की आम्ही पोरं पाराभेवती नुसतेच घुटमळायचो. थोडे दिवस असेच गेले. मग हळूहळू आम्ही पाराच्या पायऱ्यांवर बसू लागलो. भूक लागलेल्या मुलांसारखे आमचे चेहरे गरीब झाले होते. आम्ही अद्भुत गोष्टी मंडळाची जागा बदलण्याचाही प्रयत्न केला. पण दिव्याचा हलता प्रकाश आणि वर पिंपळाच्या पानांचा आवाज यामुळे पारावरच्या गोष्टी रंगत असत असं आमच्या लक्षात आलं. अशी मजा दुसऱ्या कुठल्या जागेत येईना. पण मग एक दिवस बब्बूमामाने आमची कोंडी फोडली. संध्याकाळी पारावर बसून त्यानेच आमच्याशी गप्पा मारल्या. साप पकडतानाचे त्याचे अनुभव त्याने सांगितले. तो म्हणाला, “एकदा एका घरात साप निघाला आणि पाहतापाहता गायब झाला. सगळे लोक कंदिलाच्या प्रकाशात साप शोधू लागले. साप काही सापडेना. सगळे कानेकोपरे शोधून झाले.
also read : Story of Our friend Immy! in Marathi.
धान्याचे डबे, मडकी, कणग्या पालथ्या केल्या. पण साप डोळ्यांसमोर गायब झाला होता. शेवटी कंदील हातात धरून आखडलेले आबा कंदील खाली ठेवून ओट्यावर टेकले तर त्यांच्या धोतराच्या सोग्यातून साप बाहेर पडला…” अशा किती तरी गमती. दुसऱ्या दिवशी आम्ही सगळी पोरं उडवलेल्या चिमण्या दाणे टिपायला परतून याव्यात तसे गोळा झालो आणि आमचं अद्भुत गोष्टी मंडळ पुन्हा एकदा सुरू झालं. देवासमोरचा प्रकाश वाऱ्याबरोबर हलू लागला. पिंपळाची पानं वाजू लागली. डोक्यावर मणी असलेला नाग दबा धरून बसलेलाच होता !